मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर नाराजीनाट्य सुरु झाले आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मंत्रिपदाच्या मुद्द्यावर भाष्य करत नाराज असल्याचे मान्य केले.
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “जो उशीरा आला त्याला पहिल्या पंगतीमध्ये बसवले गेले. आणि जो पहिला गेले त्याला शेवट बसवले जात आहे. पण राजकारणात थोडं कमी जास्त होत असते. आम्ही केवळ मंत्रिपदासाठीच गेलो नव्हतो. मंत्रीपद दिले तरी चांगले, नाही दिले तर त्याहून चांगले. पण मुख्यमंत्री म्हणाले, मी शब्द दिला आहे आणि मी शब्द पाळणाऱ्यातला आहे. त्यावर माझा विश्वास आहे. पुढील मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये होईल त्यात तुमचा समावेश केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.” अस कडू म्हणाले आहेत.
शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नाराजीनाट्य सुरु झाले आहे. संजय शिरसाठ,बच्चू कडू हे नाराज आहेत कडू यांनी अपंग कल्याण खाते मागितले होते. पण सत्तार, केसरकर यांनी दबावतंत्राचा वापर करत मंत्रिपद मिळवल्याने शिंदे गटात आॅल इज वेल नसल्याचे चित्र आहे.