‘एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्रा सुटकेशी’
भाजपाच्या नेत्याकडून शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान, पहा काय म्हणाले
सातारा दि ३०(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला जात आहे. राज्यपाल कोश्यारींनी केंद्रीय नितीन गडकरी यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली होती. हा वाद शमत नाही तोवर भाजपाच्याच आणखी एका नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या शौर्याची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीशी केलीआहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतापगड किल्ल्यावर आज ३६३ वा शिवप्रताप दिन साजरा करण्यात येत आहे. यासाठी गडावर भव्य कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीशी केली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगाजेबाने पकडून आग्र्याच्या किल्ल्यात जेव्हा बंदीस्त केलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराज हे स्वत: साठी नाही तर हिंदवी स्वराज्यासाठी युक्ती काढत सुटका करून घेतली. त्यामुळेच भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवलं होतं. पण ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं. पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले,’असे म्हणत लोढा यांनी शिंदेच्या बंडखोरीचा दाखला दिला आहे.
शिवप्रताप दिन सोहळ्यात मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी भाषण केलं. मंगलप्रभात लोढांनी बोलताना उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीची तुलना थेट औरंगजेबाशी करत एकनाथ शिंदेंच्या मार्गातील व्हिलन ठरवलं. यामुळे विरोधक आक्रमक झाले असून भाजपावर चाैफेर टिका केली जात आहे.यामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.