मुंबई दि २२(प्रतिनिधी)-एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पावसाळी अधिवेशन वादळी होणार असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. त्याप्रमाणे हे अधिवेशन वादळी होत असून सभागृहातच नाही तर सभागृहाबाहेर देखील विरोधक सरकारवर आसूड ओढताना दिसत आहेत. आज देखील विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आहे. त्यामुळे शिंदे सरकार बॅकफूटवर गेले आहे.
आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके…”, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली त्याचबरोबर “ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय…”, अशा घोषणा देत भाजपा सरकारी यंत्रणाद्वारे करत असलेल्या दबावाच्या राजकारणाचा निषेध केला. या घोषणाबाजीच्या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरलं. विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात साऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शिंदे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
शिवसेनेचे सुमारे ५० आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. या सर्व आमदारांना भाजपाकडून प्रत्येकी ५० कोटी रूपये देण्यात आले अदा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. याआधीही विरोधकांनी अशाच घोषणा देत शिंदे सरकारवर टिका केली होती.