Latest Marathi News
Ganesh J GIF

हिम्मत असेल तर खारघर घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करा

खारघर घटनेवर सरकारची पोलखोल करत शिंदे फडणवीसांना आव्हान

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून या लढ्यासाठी जे पक्ष बरोबर येतील त्यांना एकत्र घेऊन लढा दिला जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कोणाला काय वाटते आणि कोणाच्या मनात काय आहे, हा आमचा प्रश्न नाही, आम्ही काही पक्षांना बरोबर घेऊन लढत आहोत, त्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात पण देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे, देश विकून देश चालवला जात आहे, शेतकरी, तरुणांना बरबाद केले जात आहे, महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. अशा परिस्थितीत भाजपाच्या विरोधात एकत्रित लढा दिला पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे, जे पक्ष बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन लोकशाही व संविधान वाचवण्याचा लढा देऊ. असा विश्वास व्यक्त केला. खारघर घटनेवर शिंदे सरकार सत्य लपवत आहे. सरकारकडून मृतांचा आकडाही जाहीर केला जात नाही. हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता सुरु होणार होता पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उशिरा आल्याने तो ११.३० वाजता सुरु झाला. रणरणत्या उन्हात लाखो लोक बसले होते. या कार्यक्रमावर सरकारच्या तिजोरीतून १३.८० कोटी रुपये खर्च करूनही लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती आणि त्याचवेळी नेते व मंत्र्यांसाठी आलीशान वातानुकुलीत व्यासपीठ तयार केले होते. लाखो लोक पाण्यासाठी तडफडत असताना हे मंत्री, संत्री शाही भोजन झोडत होते, त्याचे फोटोही प्रसार माध्यमात प्रसिद्ध झाले आहेत. खारघरमध्ये कार्यक्रम सुरु असताना पहिला मृत्यू १२ वाजता झाला तरिही कार्यक्रम सुरुच ठेवला. एवढा मोठा प्रकार घडूनही सरकारचे मंत्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच वेळ दिली होती असा आरोप करुन त्यांना दोषी ठरवत आहेत. या सरकारला जनाचा नाही मनाची जर असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती पण सरकारने एका आयएएस अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली आहे, हा केवळ धुळफेक करण्याचा प्रकार असून सरकारमध्ये हिम्मत असेल तर उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांकडून खारघर घटनेची चौकशी केली पाहिजे.

खारघर घटनेने महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लावली परंतु राज्यातील सरकार मात्र त्याकडे फारसे गांभिर्याने पहात नाही. या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून सत्य परिस्थिती काय आहे हे जनतेला कळावे यासाठी प्रदेश काँग्रेसने आज राज्यभर सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेऊन शिंदे फडणवीस सरकारची पोलखोल केली व खारघर घटनेतील सत्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!