
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी यांचा विवाह सोहळा ३ मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे अत्यंत शाही थाटात पार पडला. साखरपुड्यापासूनच चर्चेत असलेल्या या विवाह सोहळ्याच्या भव्यदिव्य आयोजनावरून सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. अखेर या सर्व ट्रोलर्सना इंदोरीकर महाराजांनी त्यांच्याच खास शैलीत खणखणीत उत्तर दिले आहे.

नेमकं काय म्हणाले इंदोरीकर महाराज?

“लोकांना साधेपणाचा सल्ला देणारे महाराज स्वतःच्या मुलीचे लग्न इतके मोठे का करतात?” असा प्रश्न विचारणाऱ्यांना महाराजांनी सुनावले आहे. ते म्हणाले, “साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली तशी ही चर्चा एक वर्षभर आरामशीर चालेल. ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलंय आणि ज्याच्यावर ज्ञानोबारायाची कृपा आहे, त्याने लग्न मोठं जरूर करावं.”इतकेच नव्हे तर ‘मठ्ठा’ देण्यावरून होणाऱ्या टीकेवरही त्यांनी भाष्य केले. “मी माझ्या सर्व कार्यक्रमातून मठ्ठा वजा केला आहे, त्यामुळे त्याबाबत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

लग्नाचा शाही थाट आणि १० एकरचा मांडव
या विवाह सोहळ्यासाठी गुंजाळवाडी येथे तब्बल १० एकर क्षेत्रात भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता. सुमारे ३ लाख लोकांसाठी भोजनाची आणि बसण्याची जय्यत व्यवस्था करण्यात आली होती.

