
ज्या युवकांचे लग्न जुळत नाही, त्यांना हेरून त्यांना लग्नाच्या जाळ्यात ओढायचे आणि नंतर लाखो रुपयांना लुटायचे, अशा एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. गेवराई तालुक्यातील उमापूर गावात हा खळबळजनक प्रकार समोर आला असून, एका युवतीने चक्क ९ वे लग्न करून एका युवकाला ८ लाखांचा गंडा घातला आहे.

नेमकी घटना काय?

उमापूर येथील एका युवकाचे लग्न जमत नसल्याने काही एजंटनी मध्यस्थी केली होती. लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली या टोळीने युवकाकडून लाखो रुपये उकळले. थाटामाटात लग्नही लावून दिले, पण लग्नानंतर काही दिवसांतच या ‘नवरी’चा आणि तिच्या टोळीचा खरा चेहरा समोर आला. तपासात असे उघड झाले की, ज्या युवतीसोबत या युवकाने संसार थाटला होता, तिचे हे ९ वे लग्न होते.

लुटीची ‘मोडस ऑपरेंडी’
ही टोळी प्रामुख्याने ग्रामीण भागातील अशा युवकांना लक्ष्य करायची ज्यांचे लग्न काही कारणास्तव ठरत नाही.एजंटच्या माध्यमातून संबंध प्रस्थापित करणे.
लग्न लावून देण्यासाठी मुलाकडच्यांकडून लाखो रुपये उकळणे. लग्नानंतर काही दिवस सासरी राहून संधी मिळताच घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन नवरी पसार व्हायची.
पिढीत युवकाची पोलिसांत धाव
“मला अंधारात ठेवून हे लग्न लावून देण्यात आले. ज्या युवतीशी माझे लग्न झाले तिचे आधीच ८ जणांशी लग्न झाले होते,” असा आरोप पीडित युवकाने केला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली असून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
या टोळीने ग्रामीण भागातील अनेक युवकांना अशाच प्रकारे लुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या टोळीतील सदस्यांचा शोध सुरू केला असून, या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

