मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाच जाहीर झाले आहे. पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातले ५ मंत्री नाराज झाले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे दादा भुसे यांचा फोन स्विच ऑफ येत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दादा भुसे यांना बंदरे व खनिकर्म, गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता, दिपक केसरकर यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन तर संदिपान भुमरे यांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन ही खाती देण्यात आली आहेत. त्यामुळे ते नाराज आहेत. याआधी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्यामुळे संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाराजांची मनधरणी करावी लागणार आहे. जर नाराजी दूर झाली नाहीतर शिंदे गटाच्या फुटीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरीही देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळातील पाॅवरफुल मंत्री आहेत. गृह वित्त उर्जा अशी महत्वाची खाती त्यांच्याकडे असणार आहेत. त्यामुळे भाजपचा या मंत्रिमंडळात वरचष्मा राहणार आहे.