मुंबई दि ३१ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा केल्यानंतर महत्वाचे पदाधिकारी नेमताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निष्ठावंताना झुकते माप दिले आहे. बंडानंतरही अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवल्याने त्यांना आता महत्वाची पदे देत पक्ष बांधणी सुरू केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाविरोधी घेतलेल्या भूमिकेने शिवसेनेत बंडाळी झाली. यात अनेक कट्टर मावळ्यांनी ठाकरेंची साथ सोडली. पण आता सोडून गेलेल्या नेत्यांच्या रिक्त पदांवर उद्धव ठाकरे यांनी नव्याने पदाधिकारी नियुक्त केले आहेत. नेतेपदा नंतर ठाकरेंनी आता उपनेत्यांची घोषणा केली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासहित ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर दत्ता दळवी, कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्हाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, यांच्यासह ज्योती ठाकरे, संजना घाडी, आशा मामेडी यांचीही शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. त्यामाध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला होता. पण हा धोका वेळीच ओळखून उद्धव ठाकरे यांच्याकडून निष्ठावंतांची विशेष काळजी घेतली जात आहे.