शिवसेना कोणाची? घटनापीठ करणार फैसला
ठाकरे की शिंदे वादात 'हा' मुद्दा महत्वाचा, सुनावणीकडे राज्याचे लक्ष
दिल्ली दि २६(प्रतिनिधी)- राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष असणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीत शिंदे गट निवडणूक आयोगाच्या कारवाईला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्याचा प्रयत्न करेल किंवा जोपर्यंत चिन्हाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनुष्य बाण गोठवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. तर शिवसेना अपात्रेबाबत निर्णय घेण्याची मागणी करणार आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर ७ सप्टेंबरला सुनावणी झाली होती.त्यावेळी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग चिन्हावर निर्णय घेऊ शकतो की नाही हे न्यायालयाने ठरवणार असे स्पष्ट केले होते. आमदार अपात्रता, राज्य सरकारची वैधता आदी मुद्द्यांवर कधी सुनावणी घ्यायची आणि आयोगापुढील सुनावणीस दिलेली स्थगिती उठवायची की नाही, याबाबत घटनापीठाकडून मंगळवारी निर्णय अपेक्षित आहे. तसेच दैनंदिन सुनावणी झाल्यास लवकर निकाल हाती येण्याची शक्यता आहे.उद्या होणारी सुनावणी न्यायमूर्तीं धनंजय चंद्रचूड,न्यायमूर्तीं एम आर शहा,न्यायमूर्तीं कृष्ण मुरारी,न्यायमूर्तीं हिमाकोहली, न्यायमूर्तीं पी नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर होणार आहे.
राज्यातील सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. खरी शिवसेना कोणाची, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय मंगळवारी होणे अपेक्षित आहे.