![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
नागपूर दि २६(प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही काळापासून नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी अनेकदा आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पण शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठे विधान करत राष्ट्रवादी आणि पर्यायाने महाविकास आघाडीची चिंता वाढवली आहे. त्यातच अजित पवार यांची सत्ताधाऱ्यांविरोधात मवाळ झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर विरोधकांच्या बैठकीत शिंदे यांच्या राजीनाम्यावर आक्रमक होण्याचा निर्णय घेण्यात आला होता.पण सभागृहात मात्र अजित पवार यांनी राजीनाम्याची मागणीच केली नाही. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर आक्रमक होण्याएैवजी अजित पवारांनी माफी मागितल्याने राष्ट्रवादीचेही आमदार अजित पवारांवर नाराज आहेत. याची तक्रार शरद पवारांकडे करण्यात आली होती. यावर शरद पवारांनी अजित पवारांकडे खुलासा मागितला होता. आपल्यावर शिखर बँक घोटाळ्याचे प्रकरण निकाली काढण्यासाठी अजित पवार सत्ताधा-यांबरोबर जुळवून घेत असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे त्यातच शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दिपक केसरकर म्हणाले की, आम्हाला सगळ्यांना अजित पवारांबद्दल आदर आहे. अजित पवारही कुटुंबातील सदस्याप्रमाणे मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे अजित पवार आमच्या सगळ्यांबरोबर आले तर आम्हाला आनंदच होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची कशी घुसमट होतेय, हे सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे असा उमदा नेता आमच्याबरोबर आला तर का आवडणार नाही,” असं विधान केसरकर यांनी केलं आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण पोटे शनिवारी अमरावतीत एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रवीण पोटे यांनी “अजित पवारांनी पहाटेच्याऐवजी दुपारी शपथ घेतली असती, तर ते आता मुख्यमंत्री असते,” असं विधान केल्याने पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या आहेत.