राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार?
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधीची 'ही' घोषणा, निवडणूक रंगणार?
दिल्ली दि ९ (प्रतिनिधी) – सलग दोन लोकसभा निवडणूका पराभूत झाल्यानंतर वाताहत झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे कुणाकडे येणार? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आगामी अध्यक्ष गांधी घराण्यातून येणार कि बिगर गांधी असणार अशी चर्चा असताना राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणूकीची उत्सुकता वाढली आहे.
सध्या राहुल गांधी भारत जोडो या यात्रेत व्यस्त आहेत. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाना साधला आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार की नाही, हे लवकरच होणाऱ्या निवडणुकीत कळेल. मी निर्णय घेतलेला आहे आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हणाले आहेत. मागील दोन वर्षापासून सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. पण प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर निवडणूकीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी यांचेही नाव चर्चेत आहे. तसेच सुशीलकुमार, अशोक गेहलोत, शशी धरुर यांच्याही नावाची चर्चा होत आहे.
भारत जोडो यात्रा तब्बल ३५७० किमीची असणार आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधत आहेत आणि भाजपावर निशाणा साधत आहेत. भाजपा आणि स्वयंसेवक संघाची विचारधारा ही द्वेष पसरवण्याची आहे. आमची यात्रा भाजपाच्या याच विचारधारेच्या विरोधात आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी ही यात्रा सुरु केली आहे.