अब्दुल सत्तारांमुळे भाजप व शिंदे गटात मिठाचा खडा
सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाची खेळी, एकनाथ शिंदेची गोची
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर राज्यात सगळीकडे संताप व्यक्त करण्यात आला. सत्तार यांनी माफी मागितली असली तरीही राष्ट्रवादीने सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी लाऊन धरली आहे. आता तर भाजपानेही अब्दुल सत्तार यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात वादाला सुरुवात झाली आहे.
भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची बेताल वक्तव्यावरून कानउघडणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तार यांची तक्रार करत समज देण्याची मागणी केली आहे. फडणवीस म्हणाले की, “कुणीही महिलाबद्दल अपशब्द काढू नये. अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोध करू. जसे आमच्या कडच्या मंडळींना जसे नियम लागू आहे तसे त्यांना देखील लागू आहे. आचारसहिंता दोन्ही बाजूने पाळली पाहिजे. सत्तार चुकले. पण खोक्यांची भाषा योग्य नाही. राजकारणामध्ये बोलण्याची पातळी खूप खाली चालली आहे. सगळीकडच्या लोकांनी आचार संहिता पाळली पाहिजे मोठ्या नेत्यांनी आपल्या लोकांना सांगितलं नाही, तोवर हे शक्य नाही असे म्हणत फडणीसांनी सत्तारांचे कान टोचले आहेत.
सत्तार आणि फडणवीस २०१९ साली खुपच जवळ आले होते.पण अचानक सत्तार यांनी शिवसेनेने प्रवेश केला. तर शिंदेसोबत हातमिळवणी केल्यानंतर सत्तार यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपाने विरोध केला होता. आता तर भाजपाला सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचे चांगले कारण मिळाले आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमा टिकवण्यासाठी भाजपानेही सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला आहे. पण यामुळे एकनाथ शिंदे यांची चांगलीच गोची झाली आहे.