महाविकास आघाडीतील हे आमदार लवकरच शिंदे गट भाजपात जाणार
शिंदे गटातील नेत्याचे मोठे विधान, राज्यात पुन्हा राजकीय बंडाची चर्चा
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिंदे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावेळी कडू यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील भाष्य केले आहे.
बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीवर प्रहार केला आहे. ते म्हणाले ‘आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल सरकार पडण्याचे काहीही कारण नाही. सरकार बहुमतात नव्हे तर अतीबहुमतामध्ये आहे. म्हणजेच २० ते २५ आमदार इकडे-तिकडे झाले, तरी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, येत्या १५ दिवसांत इतर पक्षांतील २० ते २५ आमदारांचा शिंदे गट-भाजपात प्रवेश होऊ शकतो. अधिवेशनाच्या अगोदरच या आमदारांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे सध्या आमदारच राहिलेले नाहीत. यामुळे अन्य पक्षातील आमदारही आमच्याकडे येणार आहेत. असे म्हणत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोरच्या अडचणी वाढवल्या आहेत. कोर्टातील प्रलंबित खटल्यामुळे पक्षप्रवेश तसेच मंत्रिमंडळ विस्तार लांबत आहे, पण तोही लवकरच होईल. असे सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.
बच्चू कडू यांनी यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावताना बालीश असा उल्लेख केला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते. त्यावर बोलताना आव्हान देणे आता जुने झाले आहे. या आव्हानांना काहीही अर्थ नाही. हा थोडा बालीशपणा आहे. जेव्हा विधानसभा निवडणूक जाहीर होईल, तेव्हा त्यांनी आव्हान दिले पाहिजे अशा शब्दात कडू यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.